वटपौर्णिमा
पहाटे ५.३० ची वेळ, रविवारची पहाट. खरे तर लग्नाला केवळ ६ महिने झालेल्या आणि आठवडाभर माहेरी राहून आलेल्या मला एव्हढ्या पहाटे उठून लिहिण्याचे का बरे पडले असेल? असा विचार खुद्द माझ्याच मनात आला. असे काय विशेष घडले होते अथवा घडणार होते? तसे इतरांच्या दृष्टीने काहीच नाही पण माझ्या दृष्टीने धडकी भरणार कारण होते ते म्हणजे वटपौर्णिमा! खरे तर हा दिवस आत्तापर्यंत माझ्यासाठी इतर दिवसा प्रमाणेच एक असाच होता. पण तीन चार दिवसांपूर्वी सहज कॅलेंडर बघितले आणि डोक्यात प्रकाश पडला. प्रकाश नव्हे तर जरा हाबकलेच. अरे बापरे आपले लग्न झाले आणि आता आपल्याला पण ह दिवस यथासांग साजरा करावा लागणार की काय? हेच ते कारण होते हबकण्याच. मग डोक्यात विचार आणि तशी कृती सुरू झाली. एखादी गोष्ट आपल्याला घडवून आणायची असेल तर आपण वातावरण निर्मिती सुरू करतो तसच मी काहीसं सुरू केले. नवऱ्यापाशी जरा खोचकपणे " वटपौर्णिमा आलीय हा" असे बोलले आणि त्याच म्हणने काय आहे ते काढून घेतले.खरे तर असे करायची मला काहीच आवश्यकता नव्हती कारण त्याच मत काहीही असो तो ते माझ्यावर लादेल असा नवरा नाही हे मला ठाऊक होते , पण माझ काय मत आहे हे ...